व्यापार युद्धाचा चीनला फटका   

अर्थनगरीतून, महेश देशपांडे 

अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धाचे  परिणाम दिसू लागले असून चीनची अर्थव्यवस्था धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. मात्र भारतीय निर्यत वाढली आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात अ‍ॅपलने अव्वल स्थान पटकावले आहे. 
 
जगातील दोन सर्वात दोन मोठे देश असलेल्या अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापारयुद्धाने धोकादायक वळण घेतले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रत्युत्तर शुल्काचा   चीनच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत  परिणाम झाला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या मते अमेरिकेने ट्रम्प यांनी लादलेले शुल्क २०२५ अखेरपर्यंत सुरू ठेवल्यास चीनची अमेरिकेतील निर्यात ७७ टक्क्यांनी कमी होऊ शकते. २०२४ मध्ये अमेरिकेने चीनमधून अंदाजे ४४० अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या; परंतु २०२५ मध्ये त्यात मोठी घट अपेक्षित आहे. 
 
चीनच्या अर्थव्यवस्थेवर ट्रम्प यांनी लादलेल्या प्रत्युत्तर  शुल्काचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.  चीनची अर्थव्यवस्था कोरोनानंतरच्या मंदी, कमकुवत देशांतर्गत मागणी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील  संकटाशी झुंजत आहे. चीनच्या औद्योगिक आरोग्याचा मोजमाप मानला जाणारा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) एप्रिलमध्ये ४९ पर्यंत घसरला. मार्चमध्ये हा आकडा ५०.५ होता. ५० पेक्षा कमी गुण मिळाल्यास उद्योगांची उलाढाल  कमी होत असल्याचे दिसून येते. चीनची  निर्यात मंदावली आहे, बेरोजगारी वाढत आहे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात विलंब होत आहे.
 
चीनमधील तांब्याचे साठे झपाट्याने कमी होत आहेत. ही गती कायम राहिल्यास जूनपर्यंत हा साठा पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतो. अमेरिकेतून तांब्याची प्रचंड मागणी आणि संभाव्य शुल्काच्या भीतीमुळे जगभरातून चीनला होणारा तांब्याचा पुरवठा खंडित झाला आहे. ‘मर्कुरिया’सारख्या प्रमुख व्यापारी कंपन्यांनी याला ‘इतिहासातील सर्वात मोठा पुरवठा धक्का’ म्हटले आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की चीनला अमेरिकन तांब्यावर लादलेल्या करातून सूट मागावी लागत आहे. चीन सरकार उघडपणे झुकण्यास तयार नसले तरी पडद्यामागे वेगळाच खेळ सुरू आहे. 
 
रॉयटर्सच्या वृत्तानुसार चीनने व्हाइट लिस्ट तयार केली आहे. ही अशा अमेरिकन उत्पादनांची यादी आहे, ज्यांना टॅरिफमधून सूट दिली जाईल. यामध्ये औषधे, चिप्स आणि विमान इंजिन यासारख्या महत्त्वाच्या उत्पादनांचा समावेश आहे. कंपन्यांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधला जात असून त्यांच्या उत्पादनांना सूट मिळू शकते, हे सांगण्यात येत आहे. आर्थिक तज्ज्ञांचा विश्वास आहे की या वर्षी चीनचा विकास दर फक्त ३.५ टक्के असू शकतो. तेथिल उत्पादन क्षेत्र कमकुवत असून सेवा क्षेत्रदेखील घसरत आहे. तसेच बाजारातील आत्मविश्वासही कमी होत चालला आहे.
 
निर्यात वाढली
 
रिझर्व  बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार मार्च २०२५ मध्ये सेवा व्यापारासह भारताची एकूण निर्यात ८२४.९ अब्ज डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या ७७८.१ अब्ज डॉलर निर्यातीच्या तुलनेत ही वाढ ६.०१ टक्के आहे. सेवा निर्यातीने वाढीची गती कायम ठेवली आहे. २०२५ मध्ये ती ३८७.५ अब्ज डॉलर वर पोहोचली. गेल्या वर्षीच्या ३४१.१ अब्ज डॉलरपेक्षा ती १३.६ टक्के जास्त आहे.  मार्च २०२५ मध्ये सेवा निर्यात ३५.६ अब्ज डॉलर्स होती. मार्च २०२४ मध्ये ती ३०.० अब्ज डॉलर्स झाली. म्हणजेच त्यात १८.६ टक्के वाढ झाली. २०२५ मध्ये पेट्रोलियम उत्पादने वगळता व्यापारी मालाची निर्यात विक्रमी ३७४.१ अब्ज डॉलर झाली. २०२४ मध्ये ती ३५२.९ अब्ज डॉलर होती. ती सहा टक्क्यांनी वाढली.वाणिज्य मंत्रालयाने १५ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ३१ मार्च २०२५ रोजी 
 
संपलेल्या आर्थिक वर्षात भारताची एकूण वस्तू आणि सेवा निर्यात ५.५ टक्क्यांनी वाढून विक्रमी ८२०.९३ अब्ज डॉलर झाली आहे. तथापि, त्या वेळी रिझर्व बँकेने सेवा निर्यातीची माहिती  संकलित केली नव्हती. . आता प्रत्यक्ष आकडेवारी आल्याने, एकूण मूल्यात वाढ नोंदवली गेली आहे.दरम्यान, भारत आणि अमेरिका लवकरच द्विपक्षीय व्यापार करारावर पोहोचण्यासाठी चांगल्या स्थितीमध्ये आहेत. चालू चर्चेचा एक भाग म्हणून भारताच्या वाणिज्य विभागाचे आणि अमेरिकन व्यापार प्रतिनिधी कार्यालयाचे प्रतिनिधी २३-२५ एप्रिल रोजी वॉशिंग्टनमध्ये भेटले आणि येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत  द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्यावर चर्चा केली. मार्च  मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या द्विपक्षीय चर्चेचा हा पाठपुरावा होता. वॉशिंग्टन येथील बैठकीमध्ये भारतीय पतहकाने  टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ बाबींचा समावेश असलेल्या विविध विषयांवर चर्चा केली.
 
अ‍ॅपल अव्वलस्थानी 
 
दरम्यान, भारतीय स्मार्टफोन बाजारात वेगाने बदल होताना दिसत आहेत. एके काळी देशातील आघाडीची स्मार्टफोन कंपनी असलेली ‘शाओमी’ आता मूल्य हिस्सेदारीच्या बाबतीत टॉप ५ ब्रँडमधून बाहेर पडली आहे, तर अ‍ॅपल पहिल्यांदाच मूल्याच्या आधारावर भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेतली अव्वल कंपनी बनली आहे. ‘काउंटरपॉइंट रिसर्च’च्या अहवालानुसार २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये ‘शाओमी’चा घाऊक मूल्य हिस्सा पाच टक्क्यांपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. २०२४ च्या पहिल्या तिमाहीमध्ये हा हिस्सा दहा टक्के होता. २०२० च्या तिसर्‍या तिमाहीमध्ये हा हिस्सा १९ टक्के होता. दे २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये घाऊक विक्रीत ‘अ‍ॅपल’चा वाटा २६ टक्के झाला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत तो वीस टक्के होता. या काळात, ‘अ‍ॅपल’ने इतर्‍र  ब्रँडना मागे टाकत प्रथमच अव्वल स्थान मिळवले आहे. या सर्व स्पर्धक ब्रँड्सचा वाटा सरासरी दोन टक्क्यांनी कमी झाला आहे.
 
२०२४ च्या पहिल्या तिमाहीमध्ये सॅमसंग अव्वल स्थानी होता. त्यानंतर अ‍ॅपल, विवो, ओप्पो आणि शाओमी यांचा क्रमांक लागतो. २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये मोटोरोला आणि गुगल या फक्त दोन ब्रँड्सने बाजारातील वाटा वाढवला. ‘मोटोरोला’चा हिस्सा दुप्पट होऊन चार टक्के झाला. ‘गुगल पिक्सेल’चा वाटा एक टक्क्यावरून दोन टक्क्यांपर्यंत वाढला. त्याच वेळी ‘नथिंग’चा वाटा एक टक्काच राहिला. ‘काउंटरपॉइंट रिसर्च’चे संशोधन प्रमुख तरुण पाठक यांच्या मते कोरोनानंतर भारतात प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. अ‍ॅपल, सॅमसंग आणि व्हिवो सारख्या ब्रँड्सनी हा ट्रेंड ओळखला आणि ‘ईएमआय’ आणि ‘फायनान्सिंग’ योजनांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचले. यामुळेच हे ब्रँड पुढे जाऊ शकले. या ब्रँड्सचे सुमारे ५० टक्के फोन कर्ज योजनांअंतर्गत खरेदी केले गेले होते.

Related Articles